पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण ही महाराष्ट्राची विभागवार रचना कशाच्या आधारावर करण्यात आली आहे. या विभागांच्या नावामागे काय युक्तिवाद आहे?
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.
प्रदेशः
भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये विभाजणी झालेली आहे.
- विदर्भ ( नागपूर व अमरावती विभाग)
- मराठवाडा (औरंगाबाद विभाग)
- कोंकण ( कोकण विभाग)
- पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग)
- खान्देश (नाशिक विभाग)
- मराठवाडा - स्वातंत्र्यापूर्वी निझामाच्या हैदराबाद संस्थानाचा मराठी बोलणारा भाग १९५६ साली महाराष्ट्रात (तत्कालीन बॉम्बे राज्य) आला. त्याला निझामाने दिलेले मराठवाडा हे नाव पडले. १९५६ मध्ये पाच जिल्हे असणाऱ्या मराठवाड्यात आता ८ जिल्हे आहेत. मराठवाड्याची रचना ही मुख्यतः ऐतिहासिक आधारावर झालेली आहे.
- विदर्भ - भारत इंग्रजांच्या ताब्यात असताना ‘मध्य प्रांत आणि बेरार’ राज्यात जे मराठीभाषिक जिल्हे होते, ते आजच्या विदर्भात येतात. त्यात अमरावती विभाग म्हणजे इंग्रज ज्याला बेरार उपविभाग (वऱ्हाड) म्हणत होते तो आहे, तर नागपूर विभागातील जिल्हे हे मध्य प्रांत उपविभागात येत. तरी इतिहासात वऱ्हाड प्रांत म्हणजे आजचा संपूर्ण विदर्भ + मध्य प्रदेशातील काही भाग + मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा. विदर्भ विभाग भौगोलिकदृष्ट्या तसेच प्रशासकीयदृष्ट्या रचण्यात आलेला आहे.
- उत्तर महाराष्ट्र - तत्कालीन मुंबई (बॉम्बे) प्रांतातले पश्चिम आणि पूर्व खानदेश जिल्हे म्हणजे आजचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हे. तसेच प्रशासकीय सोयीसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्हे जोडून उत्तर महाराष्ट्र विभाग तयार झाला. या विभागाची रचना मुख्यतः प्रशासकीयआणि थोडीफार भौगोलिक आहे.
- कोकण/कोंकण - समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांगा या दोघांमधील क्षेत्र म्हणजे कोंकण. हा विभाग भौगोलिक असून त्यात कर्नाटकाचा उत्तर कन्नड जिल्हा आणि गोवा राज्य येतात. मात्र प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्रातले सात जिल्हे कोंकणात आहेत. ही रचना मुख्यतः भौगोलिक आहे.
- पश्चिम महाराष्ट्र - मराठा साम्राज्याचे केंद्रस्थान असलेले जिल्हे जे आधी तत्कालीन मुंबई प्रांतात किंवा त्याचा जवळ पडत होते त्यांना प्रशासकीयदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रविभागात एकत्र करण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र विभागाची रचना ही प्रशासकीय तसेच ऐतिहासिक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा