१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये ५६५ संस्थानापैकी ५६२ संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड,आणि काश्मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले.
हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र घोषित केल्यावर सहाजिकच, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच, आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो या संस्थानांच्या अधिपत्याखाली येत होता, त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते.भारताच्या पोलिसी कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलनीकरण भारतात करण्यात आले.
पार्श्वभूमी आणि इतिहास
स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढा लढला गेला. स्वतंत्र भारतात हैद्राबाद संस्थान सामील करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता. तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काब्रा, दिगंबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवलेल्या प्रस्तावाकडे निजामाने आणि कासीम रझवी याने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केले. निजामाचा धूर्त डाव होता की, १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करायचे, किंवा मग हैद्राबाद संस्थानाचे पाकिस्तानात विलनीकरण करायचे आणि असे झाले असते तर, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश तयार झाला असता किंवा भारताच्या मधोमध पाकिस्तानचा हक्क राहिला असता. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले स्वतंत्र संस्थान घोषित केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर जैसे थे करार केला होता पण त्या कराराचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या.
हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस आणि निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न भंग पावले. या लष्करी कारवाईला पोलिस ऍक्शन असे म्हणतात.सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे असणारा महाराष्ट्रातील मराठवाडाही स्वतंत्र झाला आणि निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन तेथेही भारतीय तिरंगा फडकला.
पहिल्यांदा श्री. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तेंव्हा मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मराठवाडा मुक्तीदिन समिती स्थापन झाली आणि हा दिवस मोठया उत्साहात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साजरा केला जाऊ लागला. औरंगाबाद येथे मराठवाड़ा मुक्तीदिनाचा इतिहास चिरंतन राहावा या उद्देशाने मुक्ती स्तंभ उभारण्यात आला आहे. त्या मुक्तीस्तंभावर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉ. विजेयंद्र काब्रा आदींच्या प्रतिमा चिरंतन स्वरूपात इतिहासाच्या साक्षी आहेत.
औरंगाबाद येथील मराठवाडा मुक्तीस्तंभ
चित्र स्रोत: गूगल
धन्यवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा