गावात सुंदर तीन मजली लाकडी वाडे आहेत. हे जूने वाडे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ठ असे नमुने आहेत. खासगी मालकीचे हे वाडे डागडुजी करून त्यांचे जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील चारठाणा (ता. जिंतूर) येथे हेमांडपंथी मंदिरांसह साडेतीनशेहून अधिक मंदिरे असण्याची शक्यता इतिहासतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येते. मात्र, या मंदिराच्या संवर्द्धनासह इतर मंदिरासाठी काहीही केले जात नाही. स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्राने या गावाकडे लक्ष दिल्यास जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून उदयास येऊ शकते.
![]()
मराठवाडा ही प्राचीन संस्कृतीचे संपन्न असे वैभव सांगणारी भूमी आहे. महाराष्ट्राचे आद्य आणि सर्वात दीर्घकाळ टीकलेल्या सातवाहन घराण्याची ही भूमी. सातवाहन, वाकाटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव राज्यांच्या काळातील कितीतरी समृद्ध संपन्न पुरातत्वीय पुरावे इथे आढळतात. यातीलच एक यादवांच्या काळातील (11 वे ते 13 शतक) 365 मंदिरे असलेले गाव म्हणजे औरंगाबाद-जालना-जिंतूर रस्त्यावरील चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी).
आयोजकांनी सांगितले की, या गावातील संपन्न सांस्कृतिक पुरातत्त्वीय वारसा समोर यावा, त्यावर संशोधन व्हावे, या परिसरात अजून उत्खनन व्हावे, सर्वांग परिपूर्ण असा अभ्यास या गावाचा व्हावा, या वारश्याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी चारठाण्याचे समस्त गावकरी आणि इतिहास प्रेमी, शाश्वत पर्यटनाचे अभ्यासक, पुरातत्वीय अभ्यासक तज्ज्ञ यांच्यावतीने ‘सांस्कृतिक जागृती अभियान’चे आयोजन रविवारी (ता. 12) करण्यात आले आहे.
या अभियानात रविवारी सकाळी 11 वा. अभियानाचे उद्घाटन हस्ते : मा. डॉ. प्रभाकर देव (इतिहास तज्ज्ञ), प्रमुख पाहुणे : डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी (माजी विभाग प्रमुख पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद), डॉ. रफत कुरेशी (पुरातत्त्व अभ्यासक), मा. व्हिन्सेंट पास्किलीनी (अभ्यासक शाश्वत पर्यटन) यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दुपारी सांस्कृतिक पदयात्रा (हेरिटेज वॉक) चार प्रमुख प्राचीन स्थळां भोवती आयोजीत करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता खुले सत्र होणार असून यात गावकरी, अभ्यासक, तज्ज्ञ यांच्यात चारठाण गावाला ‘संस्कृती ग्राम’ (हेरिटेज व्हिलेज) म्हणून मान्यता मिळविण्यासाठी करावयाच्या बाबींची चर्चा होणार आहे.

सांस्कृतिक जागृती अभियानाचा उद्देशच या गावाकडे अभ्यासकांचे पर्यटकांचे लक्ष वेधणे हा आहे. शासकीय पातळीवर चारठाण गावास संस्कृती ग्राम (हेरिटेज व्हिलेज) म्हणून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
गावात सुंदर तीन मजली लाकडी वाडे आहेत. हे जूने वाडे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ठ असे नमुने आहेत. खासगी मालकीचे हे वाडे डागडुजी करून त्यांचे जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सांस्कृतिक जागृती अभियानाचे आयोजन चारठाणा ग्रामस्थ, इतिहासप्रेमी, शाश्वत पर्यटनासाठी झटणारे प्रवासी, पुरातत्त्व अभ्यासक यांनी स्वेच्छेने केले आहे.

जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन
सांस्कृतिक जागृती अभियानासाठी इतिहास प्रेमी, अभ्यासक यांनी उपस्थित राहण्याची विनंती नानासाहेब राऊत (माजी सरपंच चारठाणा), सरपंच बी.जी. चव्हाण (चारठाणा), अजगर देशमुख (ग्रामपंचायत सदस्य, चारठाणा), इंदूमती भवाळे (पंचायत समिती सभापती, जिंतूर), लक्ष्मीकांत सोनवटकर (पुरातत्त्व अभ्यासक, चारठाणा), सचिन घाटूळ (चरठाणा) प्रमोद पत्की (औरंगाबाद), मल्हारीकांत देशमुख (परभणी), विलासराव चारठाणकर (परभणी), युनिसेफचे राज्य सल्लागार जयंत देशपांडे (औरंगाबाद), आकाश धुमणे (पर्यटन अभ्यासक) व अभियान समन्वयक श्रीकांत उमरीकर, अभिजीत हिरप, आकाश हिरप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा