मराठ्यांच्या इतिहासात ज्या प्रसिद्ध लढाया झाल्या, त्यात खर्ड्याची लढाई ही प्रसिद्ध आहे .
हि लढाई मार्च १७९५ मध्ये खर्डा ता . जामखेड जि . अहमदनगर येथे मराठे व निजाम यांच्यामध्ये झाली.
खर्ड्याच्या लढाईची थोडक्यात पार्श्वभूमी अशी , मराठेशाहीतील मातब्बर सरदार महादजी शिंदे ,हरीपंत फडके इ सरदार हे कालवश झालेले होते . त्यातच माधवराव नारायण पेशवे हे अल्पवयीन असून , नाना फडणवीस हे कारभार पाहत होते. हैदराबादचा निजामाचा दिवाण मुशृलमूलुख ऊर्फ मैनातदौला याने निजामास पेशवा लहान असुन स्वारी केली तर पेशव्याचे राज्य हाती येइल किंवा मोठी खंडणी वसुल करता येइल असा सल्ला दिला , त्यावरून निजाम तयार होवून लाखभर फौज जमा करून तो निघाला.
पेशव्यांचा वकील गोविंदराव काळे यांच्यामार्फत पुण्यास आम्हांस खंडणी द्यावी अन्यथा लढाईस तयार राहावे, असा निरोप दिला . त्यानुसार पेशव्यांनी देखील समरांगणी दोन हात होतील मगच खंडणी द्यावयाची असल्यास देवु , असा जवाब पाठवून शिंदे , होळकर, भोसले ,परशुरामभाऊ यांची फौज व पानसे यांचा तोफखाना घेऊन पेशवे पुण्यावरुन कोरेगाव , काष्टी तांदळी , भिलवडी येथे मुक्काम करून सिनानदी वरुन विंचरणा नदीजवळ मुक्काम केला .
इकडे निजाम बालेघाट उतरून खर्ड्याच्या अलिकडे घोडेगाव होता त्यामार्गे परांडा किल्ल्याकडे जात असताना तिथेच मराठे व निजाम यांच्या सैन्यात तुंबळ लढाई झाली . त्यात निजामाचा पराभव झाल्याने , निजामाने खर्ड्याच्या किल्ल्याचा आश्रय घेउन तहाचे बोलणे लावले , त्यानुसार तह होवून स्वारी खर्च पाच कोटी रुपये , पासष्ट लाखाची जहागीर व दौलताबादचा किल्ला या तहाने मराठ्यांना मिळाला. या लढाईत निजामाचे दोन सरदार तर मराठयांकडून एक सरदार ठार झाले .
या लढाईने मराठयांची पुन्हा एकदा उत्तरेबरोबरच दक्षिणेसही चांगलाही जरब बसली. व कालांतराने निजामाच्या दरबारात इंग्रजांचा शिरकाव झाला .
संदर्भ- खर्ड्याच्या स्वारीची बखर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा